शेतरस्ता समस्या ; शेत रस्त्याचे वाद मिटणार, शासनाचा मोठा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे….
शेतरस्ता समस्या ; शेतरस्त्याची समस्या अनेक शेतकऱ्यांना आहे. नवीन वाटणी झाल्यावर तसेच जमीन खरेदी-विक्री झाल्यावर नवीन रस्त्याची समस्या निर्माण होते. तसेच पुर्वीचे रस्ते अनेक ठिकाणी अतिक्रमण करून अडवले जातात तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता नसतो. शेतात वाहन ( ट्रॅक्टर, शेतमाल वाहतूक ट्रक, बोअरवेल ट्रक, बैलगाडी) नेण्यासाठी रस्ता असल्याशिवाय शेतीची योग्य मशागत करता येत नाही.
शेतकऱ्यांच्या या समस्येवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना शेत रस्त्याची समस्या आहे अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे, आणि ज्यांनी शेतरस्ते अडवून धरले आहेत अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावाच लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधी चा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी सुचना प्रसिद्ध करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. (शेतरस्ता समस्येवर उपाय)
शेतीतील यंत्रांची वाढती कामे आणि अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी रस्ते वाहनांच्या प्रकारानुसार तयार करणे बंधनकारक केले जाणार आहे. रस्ते तयार करण्याचा शेवटचा निर्णय तहसीलदारांना घेता येणार असल्याने तक्रारी दूर करण्याच्या प्रक्रियेत वेग येणार आहे.
शासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण करून शेतरस्त्यांना नंबर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या कागदपत्रांमध्ये रस्त्यांचा समावेश बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच शेत रस्त्यांची नोंद 7/12 उताऱ्यात इतर हक्कांमध्ये करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होतील आणि शेती करणे सोपे होईल.